समाधीचा पाया म्हणजे ध्यान (Meditation) हा आहे. ध्यानाचं अंतिम टोक हे समाधी असलं, तरीही मुळात ध्यानामागची कारणमीमांसा अतिशय व्यावहारिक आहे, ती म्हणजे स्वतःला एकटं पाडणं, काही क्षण एकटं राहणं. जन्माला आल्यापासून एक तर हे जग आपल्याला एकटं राहू देत नाही किंवा आपणच धो धो करत गर्दीत मिसळायला बघतो.
गर्दीची, लोकसंग्रहाची आवड हा खरं म्हणजे मायेचा पगडा आहे. माया म्हणजे something which is unreal. मायेची गंमत म्हणजे ती तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या प्रामाण्यावर सिद्ध होऊनही सत्यापासून लांब असते. सत्य म्हणजे एकच आहे, ते असे, की ‘आपण खरोखरच एकटे आहोत’ आणि मायाबाई ते सत्य हाणून पाडतात आणि आसपास गोतावळ्यांचा कोलाहल सुरू करतात आणि कालांतराने तेच सत्य वाटू लागतं....
आदिम आणि सनातन एकांतवास किंवा एकटेपणाची तीव्र जाणीव ध्यानात होते... वेळ लागतो; पण कधी तरी होतेच. त्याशिवाय तुम्हाला समाधी अवस्थेपर्यंत जाता येत नाही. जेवढा गोतावळा अधिक तेवढे तुम्ही मायेत गुरफटून जाता. म्हणूनच ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांनी ‘नामस्मरण करा’ असा संदेश सर्वांना दिला. त्रयोदशाक्षरी राममंत्राचा जप करत राहावा. नामावर अनुसंधान ठेवलं तर तेही एक ध्यानच आहे. नामच तुमचं बोट अलगदपणे धरून मोक्षवाटेवर चालायला शिकवते हा माझा अनुभव आहे.
- सचिन मधुकर परांजपे (पालघर)